Sunday, November 8, 2020

पपा

 




साधारण चार वर्षांपूर्वी मी जैचई बद्दल लिहिलं तेव्हा पपांबद्दल देखील लिहीन असं ठरवलं होतं. पण राहूनच गेलं. ३-४ महिन्यांपूर्वी आमच्या बुक क्लब मध्ये आम्ही "A Man Called Ove" हे पुस्तक वाचलं आणि पपांची आठवण झाली पण पुन्हा राहून गेलं. मग अगदी परवा परवाच "भाई-व्यक्ती कि वल्ली" हा पुलंवर चित्रपट पाहिला आणि पुलं, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे शिवाय फर्ग्युसन कॉलेज, प्रयाग हॉस्पिटल पाहून पुन्हा आठवण झाली आणि आता लिहावेच असे ठरवले.

हे वाचण्याआधी ज्यांनी जैचई बद्दल वाचलं नसेल ते आधी वाचावं म्हणजे काही संदर्भ लागतील जैचई

पपा म्हणजे दिलीप जोशी. पण त्यांच्या कुटुंबातले आणि आमच्या वाड्यातले सगळेच लोक त्यांना पपा म्हणूनच संबोधायचे. साधारण १९१९ सालचा त्यांचा जन्म असावा. ऐशींच्या दशकात कधीतरी त्याची एकषष्टी झाली होती. मला जितक्या आधीचं आठवतंय तेव्हापासून मी त्यांना रिटायर असलेलंच पाहिलंय. विचारायचं फारसं कारण नव्हतं पण माझ्या मते शिक्षण खात्याशी त्यांच्या नोकरीचा संबंध होता. सेवादलातही बहुतेक काम केलं होतं. एकदा इंग्लंडला देखील जाऊन आले होते.

जैचई जर निरागस, बालमनाची तर त्याहून पपा एकदम तटस्थ आणि शिस्थखोर स्वभावाचे. घरातल्या गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या, सर्वकाही रीतसर आणि नीटनेटकं ठेवावं याकडे कल. वाचनाची खूप आवड. शास्त्रीय संगीताची आवड. त्यांना आठवले कि काही गोष्टी चटकन डोळ्यासमोरून जातात. एका लांबश्या आरामखुर्चीत पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत असलेले पपा, गॅलरीत येरझाऱ्या घालणारे पपा, बुकमार्क म्हणून वापरायला जाडसर कागदाची कात्रणं करणारे पपा, त्यांच्या खास गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे अप्पा पटवर्धन नावाच्या मित्राशी गप्पा मारत असलेले पपा

माझ्या बहिणीशी जसं जैचईशी अधिक सूत होतं तसं माझं पप्पांशी. आपल्या इथे शारंगपाणी पुस्तकप्रेमी आहेत, तसे पपा होते. त्यांच्याकडे लहानसा पुस्तकांचा साठा देखील होता. माझी वाचनाची आवड त्यांच्या घरीच रुजली आणि जोपासली गेली. ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचं सभासद व्हायला waiting list असायची पण पपांनी त्यांचा ओळखीवर कि प्रिव्हिलेजवर मला membership मिळवून दिली. रविवारच्या वर्तमानपत्रातल्या कोड्या मधला एखादा राहिलेला शब्द मी सोडविला कि एकदम "वा बरोबर " असे काहीसे म्हणायचे. माझी पहिली कविता कॉलेजच्या मासिकात छापून आली ती मी त्यांना दाखवली तेव्हा अशीच शाबासकी दिलेली. पं. भिमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांचं गायन रेडिओ किंवा टीव्ही वर असेल तर लक्ष देऊन ऐकायचे आणि दाद द्यायचे. मी लहान होतो त्यामुळे कळायचं/ आवडायचं नाही पण कुठेतरी बीज रुजत होतं.

जैचईच्या आजारपणाचा आणि मृत्यूचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव झाला. अंतू बरवा मध्ये अंतूशेठ एकदा त्यांच्या पत्नीबद्दल सांगताना म्हणतात " ही गेली आणि दारचा हापूस तेव्हापासून मोहोरला नाही " तसं काहीसं पपाचं झालं असावं. हे सर्व मला त्यावेळी उमगलं नव्हतं पण मागे जाऊन पाहताना एक दोन प्रसंग आठवतात आणि याची जाणीव होते. दिवसभर मुले कामानिमित्त घराबाहेर असायचे तेव्हा घरात एकटेपण हे सुद्धा असेल. मी फर्ग्युसनला कॉलेजात असताना किंवा नंतरही अनेक वेळा अधून मधून दुपारी त्यांच्या घरी जाऊन वाचत वगैरे बसायचो. आमच्यात  खूप संवाद व्हायचा असे नाही पण निदान सोबत असायची.

१९९८ ला मी अमेरिकेत आलो त्यानंतर एक दोनदा पुन्हा पुण्याला गेलो. दरवेळी त्यांची तब्येत बऱ्यापैकी  खालावलेलीच होती. एका भेटीत मी गेलो तेव्हा ते पलंगावर पहुडले होते. शरीर आणि स्मरणशक्ती दोन्ही क्षीण झालेलं. मला नीटसं ओळखलं कि नाही कळत नव्हतं. मला अनावर झाले आणि त्यांचा हात हातात घेऊ मी तसाच अश्रू गाळत बसलो. परत  आल्यानंतर काही दिवसातच बातमी आली कि पपा गेले.

मी हे सर्व का लिहितोय? वयाची पन्नाशी जवळ आली, आयुष्याची उतरण सुरु झाली, एकेक पान लागले गळावया व्हायला लागले, कि मागे वळून पहाणं आलं. विशेषतः आपल्यावर ज्यांचा विशेष प्रभाव असतो, संस्कार असतात, जिव्हाळा असतो त्यांच्याबद्दल. किंवा कदाचित आरती प्रभूंच्या ओळींसारखं काहीसं असावं "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने". पपांच्या आता माझ्याकडे आहेत त्या आठवणी आणि माझ्याकडे राहून गेलेलं त्यांचं एक पुस्तक, माझ्याहून अधिक वयाचं, पिवळसर पाने सुटी सुटी झालेलं आणि त्यांची स्वाक्षरी असलेलं. आणि आहेत काही सवयी, नीटनेटकेपणाची, कात्रणांची बुकमार्क्स करण्याची, पुस्तकांवर तारीख घालून स्वाक्षरी करण्याची....

सुरेश नायर

नोव्हेंबर  २०२०

Sunday, November 1, 2020

Trick or Treat

 A short, entertaining homemade film made on occasion of Halloween 2020



Saturday, October 10, 2020

Rada (राडा) - A Short Marathi Film

A short entertaining homemade film made during the 2020 lockdown period and a sequel of Kadha (काढा), another short film https://www.youtube.com/watch?v=_7EbodVJAZ0&t=1s




Sunday, August 30, 2020

Man's Best Friend

 Like Karen Blixen reminiscing in "Out of Africa" with the opening lines 'I had a house in Africa at the foot of Ngong hills', I want to say "I had a dog of my own, longtime back......" I don't have a dog now. Maybe someday. But I do have memories of a few I was close to.

Moti (Pearl) was a community dog. He belonged to no-one in particular yet he belonged to everyone in our Wada/ Chawl in Pune. I don't remember this but I have anecdotes of me, as a toddler, poking my fingers into Moti's eyes and him just shifting a bit away, but not once getting annoyed or agitated by it. His days during the week as to the go-to family for meals were sort of fixed. Daytime with some families, every night at Joshi's home for milk-poli except on Thursdays. That day of week was my father's day off and we had mutton for dinner so Moti was our guest of honor for the delicacies of leftover bones etc. Every once in a while, there would be news going around that the municipality 'bevarshi shwan pathak' van picked up Moti and someone from the building would go to get him liberated, claiming ownership. Why someone didn't adopt him officially I don't know. But the fact that he was freed and brought back every time, showed his worth to all of us. I don't remember distinctly what happened to him. The building was demolished years back, a modern business complex sitting in its place now on FC Road. Hopefully he died in peace before that, his soul resting in peace.

Jedi was mine. He came to our home, in my college years, just a few weeks old. A chubby, cuddly puppy, with shiny brown coat, that I fed milk to and coaxed to sleep on my lap. He was a mix of some sort, breeds and all that stuff not a common knowledge among us back home then. His coat, ears and body structure made it clear he had some pedigree rather than being just a mongrel. I had just watched Star Wars movies and chose Jedi as his name. But we referred to him as JD (as in the initials). 

He would recognize my bike from far away and was ready to give his highly enthusiastic welcome (jumping and licking all over my face ) whenever I came home from outside. Once in a while when he somehow got loose, he would roam around the neighborhood, exploring the "gali ki kudiyan" and getting in fights with his competitors. Coming home was a bit hilarious affair, tail under his butt, head down, his behavior was like an errant child saying sorry, while I scolded and washed the mud off him. The bonding of love and friendship lasted for a few years, then for some logistical reasons we had to give him away to someone. It was a mistake I regret to this day. 

Sunny was our friend's, Sapre's dog. I came to know him early on, while we used to have Natak practices at their home. Thanks to Jedi I am comfortable around dogs and like to pet them. Sunny loved the nuzzling/ neck rub, laying down on his back and poking with his paws, asking for more, if I stopped. My relationship with him was somewhat like a visiting grandparent or uncle, not being the primary caregiver but an occasional visitor who will pamper you. Rarely had I visited Sapre's without being greeted by Sunny, without the rub atleast once. While his end was a tragic loss to all of us, I was glad I got a chance to say a proper goodbye to him before he left for wherever angels reside. 

Just a day or two back I was at my friend Prashant's house and while petting JJ, I suddenly realized I was calling him Sunny. A disrespect to JJ but I am sure he understands the feelings. I just need to move on and build more such friendships with these loving, loyal beings.

PS- Apart from the recent International Dog Day, these memories might also been triggered by a wonderful novel I read recently "The Friend" by Sigrid Nunez.

Suresh Nair

Aug 30, 2020

Thursday, August 27, 2020

Ganeshotsav 2020

2020 has been unusual in many aspects and a tamed down Ganapati celebration with only close family was one. However we were able to share this video on a Zoom call with many friends which made us feel as if celebrating together. It also gave a chance for a throwback to the past.



Friday, July 31, 2020

Neel Ponmane

Neel Ponmane (Blue Kingfisher) is originally a Malayalam film duet composed by Salil Chowdhary and sung by Yesudas with another singer. I have listened to this from childhood and love it. When I tried singing it on on Smule, Aai (my mother) said I am butchering the Malayalam words. So I wrote Marathi lyrics for two stanzas and sung the third in Malayalam. But this is not a word to word translation of the original song, just my own poetic attempt. A couple of lines in Malayalam that I understood ('ninde pat nyan ketu - I heard your song' and 'then kudikyun - drink nectar') I tried to incorporate in the Marathi version.

निळ्या निळ्या पाखरा, रे निळ्या निळ्या पाखरा
माझ्या अंगणी येऊन देई, कोणता संकेत रे तू, निळ्या पाखरा

जागती हृदयात ह्या, जुन्या हरवल्या आठवणी,
तू साद देताना, प्रतिसाद मी देते, तुझे मधुगान ऐकुनी

नाव ना तुज गाव ना, तरी ओळखीचा तू मला
हे बंध आपुले, मी आज जाणियले, पुरे देहभान हरपुनी


Tuesday, July 21, 2020

निळ्या निळ्या पाखरा

Neel Ponmane 

Neel Ponmane (Blue Kingfisher) is originally a Malayalam film duet composed by Salil Chowdhary and sung by Yesudas with another singer. I have listened to this from childhood and love it.
When I tried singing it on on Smule, Aai said I am butchering the Malayalam words. So I wrote Marathi lyrics for two stanzas and sung the third in Malayalam. But this is not a word to word translation of the original song, just my own poetic attempt. A couple of lines in Malalayam that I understood ('ninde pat nyan ketu' - I heard your song and 'then kudikyun' - drink nectar) I tried to incorporate in the Marathi version.
निळ्या निळ्या पाखरा रे निळ्या निळ्या पाखरा माझ्या अंगणी येऊन देई कोणता संकेत रे तू, निळ्या पाखरा
जागती हृदयात ह्या, जुन्या हरवल्या आठवणी, तू साद देताना, प्रतिसाद मी देते, पुरे देहभान हरपुनी नाव ना तुज गाव ना, तरी ओळखीचा तू मला हे बंध आपुले, मी आज जाणियले तुझे मधुगान ऐकुनी

Wednesday, July 1, 2020

Short Film - Friends

Division in any form, whether it racism, casteism, religion, economic and social status is not healthy for us as a society. Some of these are inherently picked up at a young age from the people, their behaviors and environment around is. Hopefully this short film sends a big message to all of us. 

Saturday, June 6, 2020

काढा (Kadha) - A short film

Sometimes things start just casually and turn into a learning and enjoyable experience. We have a movie club where we bunch of friends  get together regularly to watch a movie and discuss about it. The lockdown/ stay-at-home orders of course restricted us from getting together. A casual suggestion from me that we should make our own short movies and display it was taken in with enthusiasm and great results.

We had a time restriction of 5-7 min and this idea just took germ in my mind which I developed into a story line as we went along. I involved my mother, daughter, niece and nephew (from out of state) and they also participated with acting and videography. We used my Samsung Galaxy S9 phone for shooting and MS Video Editor program for editing. Part fun, part learning experience it was received to great reviews among our friends and we also saw some great films made by others. 

So what could have been a boring, tiresome, fearful time period in our lives became an opportunity to learn something new and have fun. Hope you like it.

Sunday, May 31, 2020

कधी रे येशील तू



(खूप वर्षांपूर्वी हा कार्यक्रम दुरदर्शन वर पाहिला होता. Youtube वर बऱ्याचदा ऐकतो. आज पुन्हा पहात होतो तर एकदम एक काल्पनिक प्रसंग डोळ्यासमोर आला)
आशाताई स्वयंपाकघरात काम करताहेत. दारावरची बेल वाजते. वर्षा (त्यांची मुलगी) दार उघडते
वर्षा - आई ए आई
आशाताई - वर्षा मी कामात आहे दिसत नाही? कशाला हाक मारतेएस
वर्षा - आई बाबूजी आले आहेत
आशाताई (लगबगीने बाहेर येत) - बाबूजी.... तुम्ही असे अचानक
बाबूजी - आहेत तश्या चला. रेकॉर्डिंग आहे. स्टुडिओत जायचंय. खाली टॅक्सी थांबली आहे
आशाताई - पण मी ते कढाई गोश्त साठी मसाला वाटत होते. पंचमला खूप आवडते म्हणून आग्रह करत ....(बाबूजींच्या चेहऱ्याकडे पहात). वर्षा, आल्यावर मसाला वाटते. आलेच इतक्यात...

आशाताई (टॅक्सीत) - बाबूजी गाणं कुठलं ते तरी सांगा
बाबूजी - सुवासिनी मधील "कधी रे येशील तू"
आशाताई - बापरे, इतक्या वर्षानंतर पुन्हा गायचं. होईल का तितकंच चांगलं?
बाबूजी नुसतेच हसतात

स्टुडिओत कॅमेरे पाहून आशाताई गोंधळतात
बाबूजी - दुरदर्शनवर कार्यक्रम आहे. चित्रीकरण करणार आहेत
आशा - पण मी तर आहे तशी आले
बाबूजी - ते गुलदाणीतलं फुल माळा. छान दिसेल

बाबूजींच्या देखरेखीत सर्व तयारी होते. रेकॉर्डिंग सुरू होतं. पहिल्या टेकमध्ये OK मिळतो. आशाताई रेकॉर्डिंग रुम मधून बाहेर येतात. बाबूजींच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून टॅक्सीतल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळतं. इतक्यात आशाताईंचं लक्ष त्यांच्या खोचलेल्या पदराकडे जातं

आशाताई - अरे बापरे. अशीच TV वर येणार की काय
बाबूजी - आशा तुझा तो तसाच राहिलेला खोचलेला पदर पाहून मला समजले की तू तुझ्या स्वयंपाकघरातून पूर्ण बाहेर आलीस आणि त्या गाण्यात तुझा जीव ओतलास. तुझ्या प्रश्नावर म्हणूनच मी हसलो. तुझ्या गाण्याची मला कधीच शंका नव्हती पण त्या पदराने मात्र पूर्ण खात्री झाली
आशाताई - तुमचे शब्द ऐकून मला पोटभर मिळालं पण पंचमसाठी अजून ते कढाई गोश्त करणं बाकी आहे. येते मी...

आणि मग ते केसात माळलेलं फुल तसेच विसरून आशाताई घरी येतात आणि मसाला वाटू लागतात.


Wednesday, May 27, 2020

Locked at Home

2020 will be memorable in most of our minds due to COVID 19. There are very few events that impact the entire world in such a dramatic way within a short span of time. The fear and uncertainty of the virus, the spiraling case and death counts, the continuous doomsday type new cycles, the lock downs/stay-at-home orders, the impact to nations economy's and businesses will all stay in our minds for a long time to come.

At a personal level also there were a lot of life learning experiences as we stumbled, adjusted, explored and thrived in the situation as time went by. Here is a short video that I created about my stay-at-home experience.



Sunday, April 12, 2020

एकांताचा वास

(A lockdown interpretation of Sant Tukaram's famous abhang. He felt trapped in to the worldly things, we feel trapped out. Both call for an introspection)

Spring ची चाहूल लागलीये. झाडांना नवीन पालवी फुटू लागली आहे. गवताची हिरवाळी दिवसेंदिवस वाढतेय. हवेत गारठा असला तरी जेव्हा ऊन असतं तेव्हा छान वाटतं. Patio वर, किंवा बाहेर चालायला गेलं की पक्षांची सुंदर किलबिलाट ऐकू येते.

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती

सध्या घरीच मुक्काम आहे. कुणाशी गाठभेट नाही. कामसुद्धा घरूनच असतं. सुरवातीला अवघड गेलं. ऑफिस मधील water cooler chats, मित्रांसोबत पार्ट्या व इतर social engagements याची सवय झालेली. आपल्याशिवाय दुसऱ्याचं पान हलत नाही किंवा दुसऱ्याशिवाय आपलं ही समजूत हळूहळू विरतेय. एकलेपणातसुद्धा करण्यासारखं खुप काही आहे, in fact आपण असा एकांत मिळत नाही याची असून मधून तक्रार करायचो याची जाणीव होतेय. मग नुसतं acceptance नाही तर या एकांताचं सुख जाणवू लागलंय

येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुणदोष अंगा येत

नशिबानं घर आहे, डोक्यावर छत आहे. घरात सर्व सोयी आहेत. इंटरनेट व electonic उपकरणं आहेत. करमणुकी साठी खुप काही आहे. वेळ पुरणार नाही इतके TV वर कार्यक्रम आहेत. लायब्ररी बंद असली तरी ऑनलाईन खूप पुस्तके आहे. अधून मधून FB, WhatApp असतंच. व्यायाम, योगा, meditation याचा शरीर आणि मनाची अवस्था सांभाळायला उपयोग होतोय

आकाशमंडप पृथ्वी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी
कंथा कमंडलू देह उपचारा
जाणवितो वारा अवसरू

प्रसंग अवघड असला की आपल्यातल्या अध्यात्म्याला उत येतो. भजन, अभंग यांची जरा जास्तच वाजणी होत आहे असं झालंय. Zoom वर हनुमानचालीसा, रामरक्षा वगैरेची सामूहिक पारायणं होतात असं ऐकलय. विठोबासोबत पोटोबा आलेच. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती करून त्याचे सेवन करणे (आणि virtual share करणे) हेही चालतं.

हरिकथा भोजन परवडी विस्तार
करोनि प्रकार सेवो रुचे

पण हे सर्व करून देखील बराचसा फावला वेळ असतो जेव्हा self reflection चालतं. जेव्हा कधी हे सर्व संपेल आणि पुन्हा सुरळीत होईल तेव्हा त्या सुरळीला, normalcyला एक नवीन वळण मिळालं असेल. कामधंदा, शिक्षण, भविष्याची नियोजने इतकच नाही तर नातीगोती, इतरांशी बांधिलकी या सर्वातच खूप बदल असेल. ती adjustment कशी असेल या सर्वाचा विचार करता करता दिवस कसे जातायत कळतच नाही

तुका म्हणे होय मनासी संवाद
आपलासी वाद आपणाशी

Tuesday, March 24, 2020

करुणा करो ना

 A prayer written during the time when all of us were going through the COVID 19 experience

तमसो मा ज्योतिर्गमय
हरण करो सबका भय
वातावरण हो शुद्धमय
जीवन कर दे निरामय
करुणा करो ना, करो हे प्रभू

पीडित तन का कष्ट मिटे
मन मे जो संदेह हटे
आशा की फिर लहर उठे
जगचक्र फिरता ही रहे
करुणा करो ना, करो हे प्रभू

Tuesday, December 24, 2019

Composition in Nand Raag

प्रीतम मोहे, तेरे बिना, जिया न लागे
आ मिल जा

क्यु मोसे झूठी आस बँधायी
प्रेम का क्यु मनमे दीप जलाया
आ मिल जा





Sunday, December 15, 2019

ध्यानस्थ झाले श्रीगजानन

मधुरा मराठेने पोस्ट केलेल्या चित्रावर मी आधी दोन ओळी लिहिल्या होत्या. आता दोन ओळींची एक छोटी कविता झाली आहे आणि "बाप्पा परत कुठे जातात आणि काय करतात?" याचं एक (काल्पनिक) उत्तर सापडलं. 
वृक्षोदरी रुद्राक्ष लेऊन
ध्यानस्थ झाले श्रीगजानन

दहा दिवसांचा आंनद सोहळा
भक्तजनांचा जल्लोषित मेळा
देता निरोप हृदयस्थ होऊन
गहिवरून आले श्रीगजानन

भाद्रपदी पुढल्या भेटण्या सर्वा
मने सुखवाया येईल सुखकर्ता
तोवर या भेटीचे करावया चिंतन
ध्यानस्थ झाले श्रीगजानन

PC: Madhura Marathe


Tuesday, December 3, 2019

असेल कारे देवा


असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?
नरकात तर ना जाणार नाही थोड्या चुकीमुळे?

गणिताच्या पेपरमध्ये केली होती नक्कल
बरे-वाईट कळण्याची नव्हती तेव्हा अक्कल

शिक्षकांचा बेदम मार, शिक्षा नाही का पुरे?
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?

पहिल्या नोकरीच्या अर्जात, झाली थोडी गफलत
साठातला सहा उलटा होऊन, झाले टक्के नव्वद
त्यावर झाली निवड, पण टिकलो राबल्यामुळे
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?

पाहायाला गेलो होतो, सुगरण छानशी बायको
श्रीमंती सासरेबुवांची, त्यावर जास्त भाळलो
आनंदे नांदवला संसार, वाढवली चार मुले
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?

झाले आता वय उतार, दुखणी दहा हजार
तरी कधी मित्रांसोबत, घेतो पेग दोन-चार
मेरे जैसे दोस्त भी अपने, राज कैसे खुले ?
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?

नाही भांडण तंटा, नाही वृत्ती राजकारणी
घोषणा एका पक्षाच्या, पण मत विरोधकासी
नाकासमोर चाललो सरळ, ना कुणा दुखवले
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?


Tuesday, October 29, 2019

दिवाळी


पुन्हा तो फराळ, पुन्हा ती रांगोळी,
शुभेच्छा देत येति, पुन्हा त्याच ओळी
तोच साज लेऊन येते दरवर्षी दिवाळी
तरी नित्य भासते जराशी निराळी


नवे छंद, नवा ध्यास, अनुभव नवा
नव्यानेच जीवनाचा आस्वाद घ्यावा
जुन्या नात्यांमध्ये यावा नव्याने ओलावा
नव्या चैतन्याचा दीप मनी पेटवावा

Saturday, November 3, 2018

"हलोवीन"

एकदा एक हलवाईण(हलवायाची बायको) होती. ती फार वाईट होती. तिला मुले अजिबात आवडत नसत. ती मुलांना फसवायला गोड गोड शब्दात बोलवायची "अरे बाळांनो या, मी तुम्हाला छान छान मिठाई देते". मुले बिचारी खूप आशेने तिच्या दारात जायची. ती त्यांना मिठाई वाटायची. पण ती खरी नसायची. काही पदार्थ दूध खव्या ऐवजी पिठाचे असायचे. काही वरून खरे पण आत कडू कारले किंवा मिरचीचा ठेचा भरलेले असायचे. मुले बिचारी फसायची आणि पडके चेहरे, कडू-तिखट तोंडे घेऊन परत जायचे.

असे खुप दिवस चालले. मग एक दिवस मुले वैतागली. त्यांनी खूप प्रार्थना केली, मनधरणी केली तेव्हा एक देवदूत प्रकट झाला. त्याने मुलांची गोष्ट ऐकली आणि तो फार दुखी झाला. तो त्या हलवाइणीवर संतापला आणि त्याने तिला शाप दिला "यापुढे तुझी इच्छा नसतानाही तू या मुलांना रोज खरीखुरी मिठाई वाटशील. इतकेच काय तुझे रूप बिघडेल आणि तू चेटकिणी सारखी दिसशील. शिवाय वर्षातून एकदा सर्व लोक चित्रविचित्र सोंगे घेऊन मुलांना मिठाई आणि आणखी गोड पदार्थ वाटतील. आणि त्या दिवसाला तुझे नाव पडेल". इतके सांगून तो देवदूत अदृश्य झाला. मुले खूप आनंदली.
आणि अश्याप्रकारे दुष्ट हलवाइणीच्या वाईट कृत्याला आळा पडला. तिच्या नावाचा दिवस साजरा करत वर्षातून एकदा सर्व लोक मुलांना मिठाई आणि गोड पदार्थ वाटू लागले. पाश्चात्य भाषेत "ण" चा उच्चार नसल्यामुळे, पुढे "हलवाइण" या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्या दिवसाला "हलोवीन" असे नाव पडले.
(सध्या fake news चं वातावरण आहे त्यात ही fake story खपून जाईल या आशेने)


Thursday, September 27, 2018

थोडासा रूमानी

थोडासा रूमानी हो जाये 
चांदनी में भीगकर 
रात सुहानी हो जाए 

ये रुत और ये मौसम 
हमको देके इशारे बुलाये 
कबसे बैठे हो तुम 
अपनी आखों में मुझको समाये 
आखें कबतक बातें करेगी 
कुछ तो जुबानी हो जाए 

सच है कबसे बैठा हु मैं 
कितनी बातें दिल में छुपाये 
डर हैं जब भी कह दु 
अनहोनिसि न हो जाए 
कहने सुनने की क्या जरुरत 
जो है रूहानी हो जाए 


Saturday, July 29, 2017

कविता

शेवटी कविताच ती, सुचली तर सुचली
नाहीतर रुसून, कोपऱ्यात बसली

कितीही मनावले, अन केली विनवणी
हटून बसते बापडी, देत हुलकावणी

मग सहज नकळत, कधी येते सामोरी
आपण मात्र धरावी, तोवर थोडी सबुरी

कारण असतेच ती, फुलपाखरासारखी
स्वैर भटकणारी, जणू एक शब्दपरी

येते तेव्हा देऊन जाते, सुंदरसे नजराणे
गजल, रुबाई, अभंग, ओवी, कधी केवळ गाणे

सुरेश नायर
२ जुलै , २०१७

Monday, June 5, 2017

जेवढ्यास तेव्हढे


ज्याला असतो कधी अर्थ
त्याचा होतो जेव्हा अनर्थ
तेव्हा वाटते ते सारे 
कसे होते व्यर्थ व्यर्थ

सर्वास नसतो कधी अर्थ
सर्वच नसते कधी पूर्त
पदरात पडलेले असते
जेवढ्यास तेव्हढे सार्थ

सुरेश नायर
५ जून, २०१७

Saturday, February 11, 2017

Denial is one way of dealing with a broken heart. Thanks to Tina Turner's song lines "What's Love Got To Do With It" which gave me the basis for this poem

मैं उनसे मिला, वो मुझसे मिले
आखें चार हुई दिल भरमाया
इसमें प्यार कहा से आया?

धडकने दिलकी तेज हुई
चेहरे पर जरा पसिना छाया
इसमें प्यार कहा से आया?

आपस में कुछ बाते हुई
खबर न रही वक्त कैसे गया
इसमें प्यार कहा से आया?

कब दिन गया कब शाम ढली
जब रात हुई तो होश आया
इसमें प्यार कहा सें आया?

अलविदा बिन वो चल पडे
नाम पूछा नहीं फिर याद आया
इसमें प्यार कहा सें आया?

बरसो पुरानी बात हैं लेकिन
बस युही आज खयाल आया
इसमें प्यार कहा सें आया?

Saturday, January 14, 2017

कशाला उद्याची बात

कशाला उद्याची बात, म्हणतो पतंग आकाशात
मुक्त मोकळे उडेन, जोवर पडे न गोते खात 

कशाला उद्याची बात, म्हणते समईमधली वात
आजच म्हणते घेईन, पूर्ती न्हाऊन प्रकाशात

कशाला उद्याची बात, गाती फुले एकसुरात
फळे होऊ कि निर्माल्य, कशास निष्फळ वाद

कशाला उद्याची बात, नाही अर्थ उगा पुसण्यात
निसटून जाती बघ फुकाचे, क्षण मोलाचे त्यात

Friday, December 16, 2016

जैचई


कुठेतरी स्मिता पाटील जाऊन तीस वर्षे झाली हे पाहिलं आणि चटकन मला जैचईची आठवण झाली. १९८६ च्या त्याच डिसेंबर महिन्यांत ती सुद्धा आम्हाला सोडून गेली.
पुण्याला लहानपणी वाड्यात राहायचो तिथे आमच्या शेजारी एक जोशी कुटुंब होतं. माझे आजी-आजोबा यांच्या वयाचे पपा आणि जैचई आणि त्यांची चार मुले (साधारण माझ्या आईच्या वयाचे) जया, मीना, चारू आणि किरण/प्रमोद. जैचई म्हणजे थोडक्यात 'जयाची आई'. माझ्या आई-वडिलांचं शिक्षण तसं बेताचं, त्यात मराठी त्यांची मातृभाषा नसल्यामुळे नुसती ऐकून बोलायला शिकलेली. पण नशिबाने म्हणा किंवा योगायोग म्हणा माझ्यावर मराठीचे उत्तम संस्कार घडवणाऱ्या जोशी कुटुंबाचा मी आणि माझी बहीण एक अविभाज्य घटक झालो होतो. माझं त्या घरचं नाव 'पिल्लू' (आता नातवंडं सुद्धा पिल्लू काका म्हणतात, म्हणजे बेबी नंदा वगैरे तसं !). त्यांच्याकडच्या TV मुळे साप्ताहिकी फेम भक्ती बर्वे ते स्टार ट्रेकचा कॅप्ट्न कर्क आमच्या दृष्टीस पडले. तसेच पुलं, वपु, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे यांच्या कलाकृतीचा परिचय झाला. माझ्या वाचन-संगीताच्या छंदाचा पाया इथेच रुजला.
तर मी सांगत होतो जैचई बद्दल. उषा जोशी (आधीची बकुल रेगे) तिच्या नावासारखीच अगदी निरागस, भोळी, बालमनाची. एखादी गोष्ट हरवली कि 'टपूदेवी टपूदेवी अमुक तमुक पटकन सापडू दे' असं ती म्हणायची ते आता गमतीचे वाटते. आता कदाचित मी तिला आजी सारखी होती असं म्हणेन कारण आम्ही तिला संबोधायचो देखील एकेरीत. पण तेव्हा नकळत का होईना गुलजारचे शब्द आम्ही पाळत होतो 'प्यार को प्यारही रेहने दो, कोई नाम ना दो' . माझ्या बहिणीवर तिचा अधिक लळा. अगदी कुठलाही पदार्थ मागितला कि न कुरकुरता करून द्यायची. मग ते थालपीठ असो कि दाण्याचा लाडू. पोळी ऐवजी तिला भाकरी जास्त प्रिय. तसेच चॉकोलेट सुद्धा. फ्रीझ नव्हता तर बर्फ आणून दूध-कोको पावडर वापरून एकदा कॅडबरी केल्याचं ओझरतं आठवतं.
लाल मिरच्या-हळकुंड, भाजदाणीचं पीठ दळायला आम्ही आनंदाने तिच्यासोबत कुठल्यातरी ठराविक गिरणीत जायचो. रथसप्तमीला दूध उतवणे, वसुबारसला गायीला खायला देणे, तुळशीचे लग्न ह्या सगळ्यात ती आम्हाला सामील करून घ्यायची. मी ५-६ वर्षाचा असताना 'आपल्याकडे सुद्धा गणपती बसवायचा' असा हट्ट धरला आणि 'म्हणतोय तर बसव, मी सांगते काय काय करायचं ' असं माझ्या आईला धीर देत तिने सगळं रीतसर करवून घेतलं. दुर्वा निवडायला आणि दोरा न वापरता दुर्वेच्या पातीनेच जुडी बांधायला मी तिच्याकडूनच शिकलो. रामशास्त्री, रामराज्य, शेजारी असे जुने प्रभातचे चित्रपट लागले कि हमखास ती आम्हाला घेऊन जायची. अनंतचतुर्दशीला मानाच्या पाच गणपतीचं दर्शन घ्यायला तीच आम्हाला लाकडीपुलापाशी घेऊन जायची.
साधारण ८३-८४ च्या सुमारास तिला पॅरालीसीसचा अटॅक आला. तिनं कुणाचं काय वाकडे केले होते मला अजून कळत नाही. घरच्यांनी, तिन्ही मुलीनी खुप छान सांभाळलं. पण शेवटी परावलंबत्व आल्यामुळे कधी कधी तिची चीडचीड व्हायची. स्वतः भाकरी थापणं आणि मुलींना सांगणं, शेवटी कुठेतरी जाणवणारच ना? २-३ वर्षे अशीच गेली. डिसेंबर ८६ ला मी दहावीत होतो. वर्गात एकदा निरोप आला कुणीतरी घ्यायला आलंय. आयुष्यात पहिल्यांदा कुणी जवळचं जाण्याचा प्रसंग. घरी येऊन तिचा देह पलंगावर पहिला आणि रडू आवरेना. आज लिहिताना सुद्धा तेच होतंय.
तीस वर्ष उलटली खरं वाटत नाही. आईच्या तोंडून कधी कधी आपसूक निघतं, जैचईने असं करायला शिकवलं. पॉपकॉर्न करताना तिच्यासोबत केलेल्या ज्वारीच्या लाह्या आठवतात. गणपतीला दुर्वा काढताना अजून जुडी बांधायला दोरा वापरत नाही. गणपतीला आवडेल कि नाही ते माहित नाही, पण वाटतं तिला आवडलं नसतं. मग दुर्वेच्या पातीनेच बांधलेली जुडी गणपतीला वाह्यली जाते.

सुरेश नायर 
१६ डिसेंबर, २०१६

Friday, September 16, 2016

एक श्रावण असाही

एक श्रावण असाही मनाच्या कोपऱ्यात
घालतो झिम्मा कधीही हवे तेव्हा वर्षात

कोण जाणे केव्हा तो येईल सामोरात
मखमली हिरवाळीत कि इंद्रधनु रंगात

मेघ दाट आषाढी अन वैशाखी वणव्यात
लपालपी, शिवणापाणी  खेळतो दंगात

भिजलेल्या उन्हात किंवा सोनेरी पावसात
आठवांच्या सरी बरसती रिमझिम नयनात

ओळखीच्या गाण्यांचे शब्द फुटे ओठात
जुने सूर फिरुनी पुन्हा फेर धरी कानात

मागे कधी, कधी पुढे, कधी भुई गगनात
झोके घेत, हिंदोळत, छळें मला दिनरात

एक श्रावण असाही हृदयाच्या कोंदणात
सखासोबती उरून राही माझा एकांतात

सुरेश नायर
9/2016



Monday, June 20, 2016

Bhairavi

(When I wrote this story last year of course I had Kishori tai Amonkar in mind. I am saddened by her passing away. A heavenly voice has gone back to where it came from. But as it says in this story "Music is light; it will always be there passing from one day to other", her music will keep shining as bright as ever. My humblest tribute to a true artist)

Bhairavi


The concert was to begin at eight in the evening.  Almost fifteen hours still ahead of it. But the actual ceremony was supposed to start at seven. There would be the introductory speeches about the foundation with its purpose and objectives, the organizers behind it and the main sponsors. Then it would be time to introduce her, thanking her for agreeing to do the benefit concert, requesting her to come on stage and begin the concert. As usual there will always be the need to test the audio set up, adjust the levels to her appeasement, before she can even start with the first note.

Friday, April 29, 2016

चाफ्याच्या झाडा - पद्मा गोळे

आयुष्याच्या पूर्वार्धात खूप काही गोष्टी आपण ठरवतो, स्वप्न रंगवतो, इच्छा - आकांक्षा यांचे  मनोरे रचतो. बरंच काही पूर्तीस येतं पण खूप काही राहूनही जातं. मग उत्तरार्धात राहून राहून मागच्या कुठल्यातरी  ठरलेल्या गोष्टीवर (constant) आपण फिरून फिरून येतो. जे हवं होतं ते तर निसटून गेलं असतं म्हणून मग 'फुलांनी ओंजळ भरलीये ना' असं म्हणत, आपली आपणच समजूत काढतो. अर्थात सरळ सोट शब्दात हे मांडणं आणि कवितेतून मांडणं यात खूप फरक आहे. इथे कवयित्रीची काव्यप्रतिभा सामोरी येते. 'केसात राखडी पण पायात फुगडी' अश्या मोजक्या शब्दात त्या खूप काही सांगून जातात. 

सुनीताबाई (देशपांडे) यांच्या आवाजात ही कविता ऐकल्यानंतर मनात रुतून बसल्या शिवाय राहत नाही. अनेकदा आठवली कि पुन्हा वाचन होतं. एकदा सहज एक चालीत वाचत गेलो आणि तीच खाली देत आहे. 
चाफ्याच्या झाडा….

चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय…. कळतंय ना….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

– पद्मा गोळे
चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा

Wednesday, April 6, 2016

तू असताना

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा 


तू असताना मी बावरते
तू नसताना मी हुरहुरते
हा रोग असा मज जडला का
असुनी ही न मी, माझी उरते

आरशात पाहता मजला मी
माझी न मला प्रतिमा दिसते
तू हसताना असतोस तिथे
अस्तित्व न काही मज उरते 

जागेपणी तू, स्वप्नातही तू,
डोळ्यातही तू, हृदयातही तू,
हासुतही तू, अश्रूतही तू
व्यापून तुझ्यात मी अवतरते 

सुरेश नायर
४/२०१६


Saturday, April 2, 2016

असा कधीही यावा

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा



असा कधीही यावा तो क्षण
जुनी पुराणी, पुसली आठवण
कवडस्यापरी, मनात माझ्या
क्षणापुरती का, चमकून जावी

असा कधीही यावा तो क्षण
वाहता वाहता, झुळूक एक ती
थबकून हलके, कानी माझ्या
जुनी सुरावट, आळवून जावी

असा कधीही यावा तो क्षण
डोळ्यापुढती चित्र देखणे
उभे राहावे जुने कशाचे
स्वप्नी अथवा जागेपणीही

असा कधीही यावा तो क्षण
सहज चालता वाटेवरूनी
पाठमोर वा, सावलीतुनी
भेट आपसूक, जुनी घडावी

असा कधीही यावा तो क्षण
वेळ जरासा, जावा थबकून
आणि पाऊले, घेत मागुती
सैर घडावी, भुतकाळची

सुरेश नायर 
४ /२/१६

Tuesday, March 29, 2016

खेळ मांडीयेला वाळवंटी

वाळूची पोती, सिमेंटचे ब्लॉक्स आणि खणलेले चर याचा आधार घेत, अहोरात्र दोन्ही बाजूंनी बंदुकीच्या फैरी झडत होत्या.  तासाभराची म्हणून उसंत नव्हती. अचूक निशाण घेऊन कुणाला वर्मी मारणे हे फक्त आधी थोडे दिवस सुरु होते. नंतर नंतर बहुतेक बंदुकीचे बार हे फक्त "खबरदार एक पाउल पुढे टाकले तर" असा दम भरण्यासाठी होते. दिवस रात्र पाळत होती. दिवसाच्या रणरणत्या उन्हात वाळू तापून वाफेचे झोळ निघत राहायचे. इथे तिथे थोडसं गवत यापलीकडे बाकी सर्व वैराण होतं. छोट्या छोट्या टेकड्या आणि त्यामध्ये उतरण असा प्रदेश आणि त्याच्या अल्याड पल्याड दोन्ही सैन्याचे तळ. काही ठिकाणी तर दोन्ही सैन्यात फक्त मोजक्या फर्लांगाचं अंतर होतं. अश्या उघड्यावर दिवसा पुढे येउन शत्रूची फळी तोडणं अशक्यप्राय होतं. म्हणून दिवसा त्यातल्या त्यात जरा कमी फैरी झडत. पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कुणी काय करेल याचा भरवसा नव्हता. म्हणून रात्री विशेष जागरूक राहायला लागायचं.

खरंतर नियमानुसार ठराविक काळाच्या अंतराने, विश्रांती देण्यासाठी पुढच्या फळीची तुकडी मागे पाठवून तिच्याजागी दुसरी तुकडी यायची. यामुळे नेहमी उत्साह आणि जोर  टिकून असायचा. पण यावेळी सीमेच्या बऱ्यापैकी मोठ्या भागावर एकाच वेळी गोष्टी तापल्या होत्या. सगळीकडचं वातावरण एकदम तंग होतं. म्हणून आहे तीच तुकडी एका जागी अनेक महिने आपला जम धरून होती. दिवसा काय तो आळीपाळीने आराम व्हायचा पण रात्री सर्वांनाच आपापल्या बंदुकी आणि जागा सरसावून सतर्क राहावं लागायचं. अर्थात ही परिस्तिथी दोन्ही कडे लागू होती.

अधून मधून नुसता आवाज आणि आरोळ्यावरून दोन्हीकडून एकमेकांना खबरदारीचा इशारा जायचा. एखादा सैनिक जोरात ओरडून देशभक्तीपर घोषणा द्यायचा. मग त्याला साथ देत आणखी सैनिक आपला आवाज मिसळायचे. मग दुसऱ्या बाजूने तसाच कल्लोळ माजायचा आणि कितीतरी वेळ कंटाळा येईपर्यंत हेच चालायचे. काही दिवसांनी खबरदारीचा इशारा, याच्या ऐवजी वेळ जाण्यासाठी, म्हणून हा एक प्रकारचा खेळ होऊन बसला होता. मग देशभक्तीपर घोषणांच्या जागी देशभक्तीपर गीते, मग नुसतीच गीते (पण एकदम जोशदार) असं चालायचं. पलीकडच्या बाजूचे कुणाकुणाचे आवाज सुद्धा ओळखीचे व्हायला लागले होते आणि त्यांना काल्पनिक, बऱ्याचदा गचाळ, शिवियुक्त नावे सुद्धा देण्यात आली होती. कुणी  डुक्कर, कुणी हराम कि औलाद तर कुणी त्यापेक्षा वाईट काही.

शांतीच्या काळात वर्षातून काही ठराविक प्रसंगी, म्हणजे  एकमेकांचे सर्वात महत्वाचे सण किंवा स्वातंत्र्य दिवशी म्हणा, दोन्ही बाजूंनी भेटवस्तू व रुचकर खाद्यपदार्थ-मिठाई यांची देवघेव व्हायची. हे खूपच शिस्तबद्ध पद्धतीने व बऱ्याच नियमांचे पालन करून व्हायचं. आणि फक्त वरच्या पातळीचे अधिकारी यात सामील असायचे. सामान्य सैनिकांना एकमेकांशी फारशी सलगी करण्यास सक्त मनाई होती आणि अर्थात तशी संधी सुद्धा नव्हती. पण तरीही काही अर्थी याचा परिणाम होऊन जरासा सलोख्याचा भाव यायचा आणि थोडे दिवस का होईना बंदुका  शांत व्हायच्या. पण गेल्या वर्षापासून पेटलेले युद्धाचे वारे अजून शांत व्हायची जराही चिन्हे दिसत नव्हती. राजकीय स्तरावर बोलणी, अंतरराष्ट्रीय देशांची मनधरणी, दटावणी, व मध्यस्ती असे सर्व प्रकार चालू होते. पण इथे, खऱ्या मैदानावर, जो जीवघेणा खेळ चालू होता त्याच्या समाप्तीची लक्षणे अजून केल्या दिसत नव्हती. अश्यात भेटी आणि मिठाई देण्याचा रिवाज मागे न पडला तर नवल. अहोरात्र दोन्ही बाजूंनी बंदुकीच्या फैरी मात्र झडत होत्या.

जसजसे दिवस जात होते तसतशी छावणीत काहीशी अस्वस्थता वाढत होती. सैन्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, बरोबर कि चूक याचा विचार न करता, वरून आलेला नियम अचूक पाळणे. अधिकाऱ्यांसमोर कसलीच तक्रार किवा साधी कुरकुर सुद्धा करायचा विचार कुणाच्या मनात नव्हता. स्वतः सैन्याचे अधिकारी राजकीय घडामोडींच्या आणि निर्णयांच्या अधीन होते. पण तरीही वस्तुस्तिथी अवघड होती. सुट्टी रद्ध झाल्यामुळे कुणाची लग्नाची तारीख येउन गेली होती, कुणाच्या घरात कधीचा पाळणा हलता झाला होता, कुणाला जवळच्या माणसाच्या शेवटच्या क्षणी जवळ राहता आलं नव्हतं. जवळच्या सगेसोयरे, मित्रमंडळी यांच्याशी साजरा करायचे वाढदिवस, सण वगैरे सर्व प्रसंग निसटून जात होते आणि या सर्वांचा अंत कुठे दिसत नव्हता.

आज वर्षाचा अखेरचा दिवस होता. मध्यरात्र उलटली कि नवीन वर्ष. जगभरात हा प्रसंग साजरा करायची आता एक परंपराच झाली होती. धर्म-जात-पात-भाषा, गरीबी-श्रीमंती या कशा कशाला न जुमानता जो तो जाणाऱ्या वर्षाला सलाम करीत नवीन वर्षाचं स्वागत करायला उत्सुक असतो. जणू काही आपल्या अपुऱ्या इच्छा, आकांक्षा येत्या वर्षात पुऱ्या होतील, किंवा किंबहुना व्हाव्यात अशी अपेक्षा करीत, सर्वांसोबत साजरा करायचा दिवस. इथे मात्र, गेल्या कित्येक महिन्यांच्या घटनांवरून हाही एक असाच निसटून जाणारा दिवस, अशी भावना होती. सकाळी कवायतीच्या वेळी एकमेकांना "संध्याकाळची पार्टी विसरू नका ", "खूप मजा करू" वगैरे उपहासात्मक शेरे दिले जात होते. एकूण नेहमीपेक्षा जरा जास्तच चैतन्य कमी होतं.

मग बातमी आली कि चोवीस तासाचा सीजफायरचा समझौता झालाय. आज दुपारी बारा ते उद्या दुपारी बारा पर्यंत दोन्ही बाजूची शस्त्रं शांत राहतील. खूप दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय प्रक्रियेला गती मिळाली होती. एका  बहुराष्ट्रीय परिषदेत महत्वाची बोलणी होणार होती आणि लढाई पूर्णपणे संपण्याची पुरेपूर खात्री वाटत होती.

या बातमीने सगळीकडे एकदम जल्लोष उठला. सुकलेल्या रोपाला पाणी घातल्यावर ते तरारून उठावं तशी सगळ्यांची अवस्था झाली. एकूण रंग पाहून वरच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा संध्याकाळी न्यू इयर पार्टीला परवानगी दिली. गावातून एक खानसामा बोलावून खास जेवणाचा बेत आखण्यात आला. नेहमीपेक्षा मद्याचा कोटा वाढवला गेला. राष्टीय झेंड्या सोबत इकडे तिकडे थोडेबहुत रंगीत कागद वगैरे सुद्धा फडकू लागले. कुणीतरी दिव्याची माळ लावली. संध्याकाळ होईस्तोवर  वातावरण पूर्ण बदलून गेले होते.

हळू हळू जमवा जमव सुरु झाली. चियर्सच्या आवाजात काचा एकमेकांना भिडू लागल्या. गप्पा टप्पा, विनोद आणि त्यावरून उठणारे हास्याचे फवारे उठू लागले. अधेमध्ये पलीकडच्या बाजूने देखील तसेच आवाज कानी येत होते. गेल्या कित्येक दिवसांचे चिंतेचे ओझे जणू गळून पडले होते आणि एक निश्वासाचे, आशेचे, हलकेपणाचे असे विश्व तयार झाले होते. मधेच कुणीतरी खिशातून मौथ ऑर्गन काढला आणि एक हलकीशी धून हवेत उठली. त्यात मग शब्दांची भर पडली आणि सूर उठले. पण आजचे सूर जोशिले, रखरखीत नव्हते तर आनंदी, आतुर असे होते. अर्थात सगळेच काही या सोहळ्यात सामील नव्हते. अजून ठिकठिकाणी पाळत होती, बंदुका सज्ज आणि सावध होत्या, फक्त नेहमीच्या इतक्या संख्येत नव्हत्या.

तास दोन तास असेच गेले. जेव्हा पार्टी सुरु झाली तेव्हा सर्वांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. खूप दिवस अंधारात राहिल्यावर उजेडाची सवय व्हायला वेळ लागतो, त्याचा त्रास होतो तसं झालं होतं. मग हळू हळू त्यात ढील पडली, हलकेपणा आला, आणि सर्वजण खऱ्या अर्थाने पार्टीचा आस्वाद घेऊन लागले. आणि तेवढ्यात धपकन आवाज आला. कुठ्न, कसला ते समजायच्या आत जो तो क्षणार्धात सावध अवस्थेत गेला. रातकिड्यांच्या आवाजाखेरीज सगळीकडे चीडीचाप शांतता पसरली. आणि कुणाचंतरी लक्ष एकदम मध्ये पडलेल्या एका फुटबॉल कडे गेले. त्याने नुसताच इशारा करून दुसऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलं. कुणीच काही हालचाल केली नाही. इतक्यात टेकाडाच्या पलीकडून आवाज आला " हरामी साला, अक्कल नाही. सांगितलं जपून कुठे मारतोय तिकडे लक्ष दे तर नाही. तुझ्या कॉलेजचं मैदान वाटलं का कुठेपण बॉल मारायला. आता अंधारात शोधणार कुठे. आणि सापडला नाही तर खेळणार काय ? एकच तर होता" आणि असेच बरेचसे कुरकुरते स्वर ऐकू येऊ लागले.

इतका वेळ रोखून धरलेले श्वास आता सुटले. शरीरं ढिली पडली. जराशी हालचाल सुरु झाली. मग घोळक्यात एकमेकांशी जरा कुजबुज झाली. आणि एकजण जोरात ओरडला " फुटबॉल शोधताय का ? इथे आमच्याकडे आलाय ". आता पलीकडची बाजू मघासारखी शांत पडली. दाट धुकं साचावं तशी हवा दाटून आल्याचा भास होत होता. ऐन लढाईच्या वेळी जितका तणाव कधी जाणवला नाही तितका आता जाणवत होता. मग पलीकडून उत्तर आलं "हो, आमचा बॉल आहे. आम्ही काहीजण नुसतेच खेळत होतो". त्यासरशी एकाने "होशियार, पाचच्या काउंटला बॉल येतोय" अशी आरोळी देत एक, दोन, तीन, चार मोजले आणि पाचला एक जोरदार किक मारून बॉल, जिथून आवाज आला तिथे परतवला. पलीकडून एकच आवाज उठला आणि कुणीतरी "खूप खुप धन्यवाद" असे ओरडले.

मग हळू हळू दोन्हीकडून एक संवाद सुरु झाला. आधी 'हैपी न्यू इयर" अश्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या गेल्या. मग '"पार्टी कशी चालली आहे" वगैरे झाले. खायला पदार्थ काय, प्यायला काय याचीही चौकशी होऊन गेली आणि उगाच "अरेरे आम्हाला पण ते खायला, प्यायला आवडलं असतं" वगैरे झालं. नंतर काय बोलावे ते कळेना पण काहीतरी दुवा जुळला होता तो तसाच सोडून जावं असं कुणाला वाटत नव्हतं. मग एकजण ओरडला "अरे सिझफयार आहे,  शस्त्रं चालवायची नाही असा हुकुम आहे मग प्रत्यक्ष एकमेकांची तोंडे तरी बघुयात. पुन्हा मौका मिळणार नाही". त्यासरशी पुन्हा शांतता पसरली, तणाव जाणवला. आणि मग आवाज आला "चालेल पण हात रिकामे नको, तुमच्याकडचे चमचमीत पदार्थ घेऊन या" आणि त्यासरशी हशा पिकला. मग दोन टेकाडाच्या मधून जिथे मोकळी मैदानासारखी जागा होती त्याच्या दोन्ही बाजूच्या सीमारेषेवर सर्व जमले. दोन्हीकडचे एकदोन जवान धाडस करून पुढे सरसावले आणि हळू हळू पावले टाकीत मध्यभागी आले. पुढे येउन एकमेकांचे हात हाती घेत शुभेच्छा दिल्या. तसे इतरही जवान पुढे आले. काही जणांनी खरंच काही खायचे पदार्थ, सिगारेट्स वगैरे भेटी आणल्या आणि एकमेकांना दिल्या. नावेगावे याची अदलाबदल झाली. तुटपुंजी का होईना ओळख जमली.

माणुसकीचा एक अभूतपूर्व सोहळा अगदी आपसूक, न सांगता, न ठरवता या रात्री इथे वाळवंटात घडत होता. ओळखीच्या आवाजाला आज चेहरे आणि नावे आली होती. सीमा पुसट झाल्या होत्या. सर्वांना माहित होते की जे होतं ते अल्पकाळा करताच होतं. त्याला खूप काही महत्व नव्हतं. उद्या कदाचित बातमी येईल कि सलोखा झालाय, युद्ध संपलंय पण तेही नेहमीचेच टिकेल याचा नेम नाही. याआधीही अनेकदा भडका उडालाय, त्यावर पाणी पडलंय आणि पुन्हा भडका उडालाय. आणि कदाचित बातमी येईल कि बोलणी मोडून पडली. पुन्हा लढाईला सुरवात होउदे. पुन्हा तोफा डगडगू द्या. पुन्हा आपआपली शस्त्रे  हातात घ्या. मात्र यावेळेला गोळी झाडताना पलीकडच्या वाळूच्या पोतींच्या आड, रात्रीच्या अंधारात दिसलेला एखादा चेहरा असल्याचा भास होईल. आणि मध्ये दम घेताना पेटवलेली सिगारेट, कुणी दिलेली भेट असेल. पण हे सर्व कदाचित नंतर आठवेल. ऐन निर्णयाच्या वेळी कर्तव्यात रुजलेली बोटे मात्र बंदुकीचा चाप ओढताना अजिबात अडणार नाहीत.

जशी जमली तशी हळू हळू पांगापांग सुरु झाली. एकमेकांचा निरोप घेत सारे एकेक करून मागे फिरू लागले. मधलं मैदान पुन्हा रिकामं झालं. अनेक पावलांच्या  ठश्यांच्या रेघोट्या मात्र सर्वत्र येता जाताना दिसत होत्या. आणि अधून मधून, इथे तिथे फक्त पुसटश्या आवाजात ऐकू येत होतं "हैपी न्यू इयर दोस्त, हैपी न्यू इयर"
सुरेश नायर
३/२९/२०१६

(काही दिवसापूर्वी आम्ही बुक क्लब मध्ये पहिल्या महायुद्धावर पुस्तक वाचलं. तेव्हा 'Christmas Truce' बद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली व कुतूहल वाटले. मग जरा शोध घेताना भारत-पाकिस्तान सैन्याचं होळी-ईदला वगैरे मिठाई देण्याबद्दल वाचले. सर्व एकत्र येउन ही कथा रचली. सुरुवातीला तसं ठरवलं नव्हतं तरी लिहिताना कुठला ठराविक देश प्रदेश न देता neutral ठेवणेच योग्य वाटले. पात्रंही तशीच. ही कथा जशी एक ठिकाणी घडली तशी इतरत्र कुठेही घडू शकते
***मला सैनिकी जीवनाचा काहीही अनुभव नाही. आहे ते सर्व काल्पनिक आहे. त्यामुळे तांत्रिक चुका भरपूर असू शकतात. त्याबद्दल क्षमस्व*** )

Friday, March 25, 2016

कुंपणापाशी ते रोप

कुठूनसं कधी एक रोप, माझ्या अंगणाच्या कोपऱ्यात
माझा डोळा चुकवून, अगदी सहज आपसूक रुजलं

कलमी गुलाबाच्या व इतर रोपांच्या ताटव्यापासून
दूर कुठेसं कुंपणापाशी, त्यानं आपलं मूळ धरलं

रोज ताटव्यातल्या रोपांना खतपाणी घालताना 
निगराणी करताना, टपोऱ्या फुलांना पाहताना

मन मोहरून जायचं, अभिमानाने भरून यायचं,
कुंपणापर्यंत नजर टाकायचं मात्र राहून जायचं

जेव्हा लक्ष गेलं तेव्हा टाकायचं होतं पार उपटून
पण वाटलं दुर्लक्ष केलं तर, जाईल स्वतःच मरून

मग पडले आजारी, राहिले अंथरुणाला खिळून
बागेत जाण्याइतकंही अंगात, त्राण नव्हतं उरून

निगराणीवाचून ताटव्यातली रोपं गेली सुकून
करपली सारी पाने अन पाकळ्या गेल्या गळून

बिछान्याशी खिडकीतून, विराण बाग दिसत होती
कलमी रोपांनी बाग कधी, आपली केलीच नव्हती

कुंपणापाशी ते रोप मात्र, झाड होऊन डवरलं होतं
बहरलेल्या फुलांनी मला, 'बागेत ये' खुणवत होतं

सुरेश नायर 
३/२०/१६

ये पावसा

ये पावसा मेघांचा रथ करुनी भेटून जा तू आनंदे बरसोनी  संकेत देई माती मृदगंध शिंपडूनी  वाराही गाई गाणी येणार तू म्हणोनी सृष्टीच आहे सारी तुजसाठ...